Posts

Showing posts from 2011

अक्कलकारा

                या वनस्पतीच्या नावातच तिचे गुणधर्म सामावलेले आहेत. मुलांना लहानपणी वडीलधारी माणसे अक्कलकारा तूप-भातात मिसळून खायला देत असत. मुलांनी लवकर बोलावे, स्पष्ट बोलावे यासाठी ते देत.  लहान मुले बोलायला शिकताना सुरुवातीला बोबडे बोलतात. पहिल्या-पहिल्यांदा या बोबड्या बोलांचे कौतुक होते. मात्र काही काही वेळा मुलाचे वय वाढत जाते, पण त्याची बोबडे बोलायची सवय काही जात  नाही. अशावेळी मुलांचे शब्दोच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून त्यांना अक्कलकारा खायला देतात. अक्कलकारा हा जिभेला चुरचुरणारा, किंचित तिखट असल्याने लहान मुले लवकर खात नाहीत. अशा वेळी युक्ती प्रयुक्तीने भातात मिसळून तूप मीठ टाकून अक्कलकारा नियमित खायला द्यावा. याच्या सेवनाने आवाज चांगला, शब्दोच्चार स्पष्ट, बुद्धी तल्लख होते.                   विविध मानसिक आजारांवर अक्कलका-याचा खूप चांगला उपयोग होतो. उन्माद, अपस्मार यासारख्या मानसिक आजारांवर याचा चांगला उपयोग होतो.                    ज्याला उत्तम वक्ता व्हायचे आहे त्याने अक्कलकारा नियमित खावा. शिक्षकी पेशा, निवेदक, समालोचक, सतत बोलण्याचा पेशा असणारे यांनी अक्कलकारा सेवन करावा

आभार

             मंडळी, आपण सर्व सुजाण वाचकांनी माझ्या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादामुळे पेज व्हिव्युज हे २५००० च्या वर गेले आहेत. व्यवसायामुळे माझे अनियमित लिखाण, वाचकांच्या ई पत्राला लवकर उत्तर न देणे, ब्लॉगची साधी सरळ भाषा, ब्लॉगला सजावट नसणे, किंचित लाजाळूपणामुळे स्वत:चा उदो उदो न करणे, माझ्या या सर्व त्रुटी आपण पोटात घालून मला जो प्रतिसाद दिला, जे प्रेम दिले याबद्दल आपले शतश: आभार !              दोन बायका सांभाळणा-यांची काय हालत होत असेल हे दोन ब्लॉग चालविताना मला कळले. त्यामुळे दुस-या ब्लॉगकडे खूप दुर्लक्ष्य झाले. याबद्दल क्षमस्व !            यापुढेही आपण असाच प्रतिसाद देऊन माझा उत्साह वाढवावा ही विनंती.  

बदाम

                         सुकामेवा म्हणून बदाम प्रसिद्ध आहेत. बदाम हे अतिशय पौष्टीक आणि शक्तीवर्धक आहेत. बदामाचे तेल सुद्धा निघते. हे तेल सौंदर्यप्रसाधनांमध्ये सौंदर्यवृध्दीसाठी, त्वचा कांतिमान होण्यासाठी वापरतात. हिवाळ्यात पौष्टीक खाद्य म्हणून बदामाचा शिरा खातात. डोकेदुखी, डोके जड होणे, अर्धशिशी यावर बदाम्याच्या शि-याचा खूप चांगला उपयोग होतो.                   आयुर्वेदानुसार बदामामुळे मज्जाधातूची वृध्दी होते. बदाम हे बुध्दीच्या वाढीसाठी खातात. बुध्दीची धारणाशक्ती वाढावी, वाचलेले किंवा ऎकलेले लवकर लक्षात यावे, एकदा लक्षात राहिलेले जास्त काळ लक्षात रहावे, जास्त माहिती लक्षात ठेवण्याचे क्षमता वाढावी यासाठी बदामाचा खूप उपयोग होतो.                   बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. तसेच प्रथिने आणि स्निग्ध पदार्थही असतात. म्हणून हिवाळ्यात बदामाचे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. डिंकाच्या लाडूत बदाम घालतात. मात्र बदाम ऊष्ण व जड असल्याने एकाच वेळी अति प्रमाणात खाऊ नयेत. 

शबरीची बोरे

शबरीने आपली उष्टी बोरे पावन करून ठेवलेली आहेतच. प्रभु श्रीरामांना मोठ्या भक्तीने उष्टी बोरे खाऊ घालणारया शबरीने बोरं मात्र अजरामर करून ठेवली आहेत. तसेच परीक्षित राजाला सर्पदंश हा बोरातील अळीच्या रूपाने आलेल्या तक्षक सर्पामुळे झाला, अशी कथा आहे.                  चिंचा, बोरे हा तर लहान मुलांचा आवडता मेवाच. तुळशीच्या लग्नापासून बाजारात बोरं यायला सुरुवात होते. आकाराने मोठी, मधुर अशी मेहरूणची बोरं प्रसिद्धच आहेत.  सारखी खा-खा होणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे अशा भस्मक रोगावर बोराच्या बियांचे चूर्ण घ्यावे. अतिसार, संडासवाटे खूप पातळ जुलाब होणे, आव यावर बोराच्या मुळ्या आणि तीळ यांचे वेगवेगळे कल्क करून नंतर ते एकत्र करून गायीच्या दुधातून घ्यावे. संडासवाटे रक्त पडत असल्यास बोराच्या मुळ्यांचा चांगला उपयोग होतो. केसतोडा झाला असल्यास तेथे बोराचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लावावा. उलट्या होत असल्यास बोराच्या बियांचे चूर्ण मधातून चाटवावे. शरीराच्या कोणत्याही भागाची आग होत असल्यास बोरीचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लावावा. बोर हे तहान भागविणारे, पित्तशामक, बल्य आहे.

तुळस

Image
मंडळी, भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदुच्या दारापुढे तुळशीवृंदावन असतेच. भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीला पूजनीय वनस्पतींमध्ये अग्रस्थान आहे. ही वनस्पती फक्त भारतीय उपखंडातच आढळते. सध्या मनपा निवडणुका जवळ आल्यामुळे गल्लोगल्लीच्या नेत्यांच्या पुढाकारामुळे तुळशीची लग्ने धूमधडाक्यात पार पडत आहेत. असो.  साध्या सर्दी खोकल्यापासून तर अनेक आजारांवर तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या एका एका गुणावर Ph.D. च्या डिग्र्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या आहेत.  तुळशीच्या प्रकारांपैकी पांढरी (राम) व काळी (कृष्ण) तुळस हे दोन मुख्य प्रकार. कृष्ण तुळस ही गुणांनी सर्वात श्रेष्ठ आहे.  तुळशीचा चहा दूध व चहा न टाकता घेतल्यास सर्दी, खोकला, ताप यावर उपयुक्त आहे. तुळशीचा काढा करून घेतल्यास तो वरील विकारांबरोबरच घसा दुखणे, अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे यावर उपयुक्त आहे. एक भाग तुळस म्हणजे पाने, सोळा भाग पाणी एकत्र करून एक अष्टमांश राहीपर्यंत आटवावे. नंतर गाळून तो काढा प्यावा. ही काढा करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.  दम्यावर तुळशीचा खूप उपयोग आहे.  तुळशीचा रस काढून तो मधातून चाटव

हिवाळ्यातील आरोग्य

                हेमंत आणि शिशिर ऋतु मिळून हिवाळा हा ऋतु तयार होतो. या ऋतूत सूर्य दक्षिण ध्रुवाकडे सरकतो. म्हणजेच दक्षिणायन होते. दिवस लहान तर रात्र मोठी असते. आयुर्वेदानुसार हा काळ ’विसर्गकाळ’ असतो. म्हणजे या काळात निसर्गाकडून प्राणिमात्राला बल प्राप्त होत असते. दिवसभर सूर्यप्रकाश असला तरी वातावरणात गारवा असल्याने प्रफुल्लित आणि उत्साही वाटते. सर्व प्रकारची कामे करण्यास उत्साह वाटतो. रात्री मात्र गारठा असल्याने ऊबदार पांघरूणात पडून रहावेसे वाटते. आयुर्वेदानुसार हिवाळा हा बलदायक, आरोग्यकारक काळ सांगितलेला आहे. शिशिर ऋतूत वातावरणात रुक्षता जास्त वाढते. झाडांची पाने गळतात. शिशिर ऋतूत ’पानगळ’ सुरु होते. त्यामुळे सर्व वृक्ष, लता, वेली, झुडुपे, एकूणच सर्व सृष्टी ओकीबोकी आणि निस्तेज दिसू लागते.  हिवाळ्यात शरीराची बाहेरची ऊष्णता कमी होते. त्यामुळे जाठराग्नी चांगलाच प्रदीप्त होतो. म्हणून हिवाळ्यात भरपूर भूक लागते. म्हणून या ऋतूत दोन्ही वेळा भरपूर प्रमाणात आहार घ्यावा. गोड, आंबट पदार्थांचे आहारात जास्त प्रमाण ठेवावे. अर्थात स्वत:ची प्रकृतीचा आणि आजारांचा विचार करावा. तसेच विशिष्ट रोगांमध्ये

अभ्यंग स्नान - त्वचा सौन्दर्यासाठी

             आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य  उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी  त्वचेचे रक्षण व्हावे , त्वचेचे निगा योग्य प्रकारे  राखली  जावी यासाठी आयुर्वेदात  अभ्यंग  स्नानाचे   महत्त्व सांगितलेले आहे.              हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे  त्वचा रूक्ष  व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे  यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी  घेणे हितावह ठरते. आपण फक्त दिवाळी सारख्या मंगल प्रसंगीच अभ्यंग स्नान करीत  असतो. परंतु केवळ दिवाळीतच नाह

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! HAPPY DIPAWALI TO ALL READERS OF MY BLOG !!!    

दुर्वा

     मंडळी, गणरायांचे आगमन घरोघरी झाले असेल. गणपतीला सर्वात प्रिय वनस्पती म्हणजे दुर्वा. गणपतीचे दिवस आले की आपण दुर्वांच्या शोधात बाहेर पडतो. दुर्वा ह्या स्त्रियांच्या गर्भाशयाचे उत्तम टोनिक समजल्या जातात. गर्भाशयाला बलकारक, गर्भपोषणासाठी उपयुक्त तसेच गर्भाशयाची आणि गर्भाची वाढ चांगली व्हावी म्हणून दुर्वांचा खूप उपयोग होतो. मासिक पाळीच्या समस्यांवर दुर्वांचा रस पोटात घ्यावा.          नाकातून घोळाणा फुटत असल्यास दुर्वांचा रस नाकात पिळावा. दुर्वा ह्या थंड आणि तहान भागविणाऱ्या आहेत. जखमेतून रक्तस्त्राव होत असून तो लवकर थांबण्यासाठी दुर्वांचा रस लावावा.        लघवीला आग होणे, लघवी कमी होणे, कळ लागून लघवी होणे, लघवी साफ न होणे या सर्व लघवीच्या विकारांवर दुर्वांचा रस घ्यावा.       डोळे येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, यावर दुर्वांच्या रसाचे थेंब डोळ्यात टाकावेत, पोटातही घ्यावेत.       उलट्या होत असल्यास तांदूळ धुतलेल्या पाण्यात दुर्वांचा रस घालून प्यावा. सारखी उचकी लागत असल्यास दुर्वांच्या मुळांचा रस आणि मध एकत्र करून प्यावे.       अंगाची आग होणे, उष्णतेजवळ काम केल्याने त्वचा ला

बेल

Image
     श्रावण महिना आला की आपल्याला बेलाची आठवण होते.   महादेवाला बेल अतिशय प्रिय आहे. श्रावणात रोज किंवा निदान श्रावणी सोमवारी तरी महादेवाला बेल वाहातात.    बेलाच्या बेलफळांचा  बेल मुरब्बा करतात. बेलमुरब्ब्याचा उपयोग  अतिसार , जुलाब यावर खूप चांगला होतो.  आव पडणे, शेम चिकट पडणे, संडास वाटे रक्त पडणे, यावर  बेलफलातील  गर किंवा बेलमुराब्बा द्यावा.    लहान मुलांना सारखी आव होत असेल तर त्यावरही  बेल मुरब्बा देतात.  मुलांना जंत झाले असल्यास बेलाच्या पानांचा रस द्यावा. अम्लपित्तावरही बेलाच्या पानांचा रस देतात.      शरीराला घामामुळे दुर्गंधी येत असेल तर बेलाच्या पानांचा रस लावावा. घामाची दुर्गंधी येण्याचे बंद होते. उलट्या होत असल्यास बेलफळाच्या सालीचा काढा प्यावा.    दमा, खोकला यावर बेलाच्या पानांचा काढा द्यावा. तोंड आले असल्यास बेलाच्या सालीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात. तोंड येणे, तोंडात जखम होणे, फोड येणे, यावर या काढ्याचा खूप उपयोग होतो. मूळव्याध, मलावष्टंभ यावर बेलाच्या पानांचा रस द्यावा.       बेलापासून 'बिल्वावलेह' तयार करतात. शौचाला शेम चिकट पडणे, आव पडणे,

आघाडा

Image
       श्रावण महिना सुरु झाला की आघाड्याच्या शोधात आपण बाहेर पडतो. श्रावणात विविध देव देवतांना बेल, आघाडा, दुर्वा वाहातात. इतर वेळी मात्र आपल्याला ह्या वनस्पतींची आठवण होत नाही. पावसाळ्यात आघाडा जागोजागी उगवतो. पांढरा आघाडा आणि तांबडा आघाडा असे आघाड्याचे मुख्य दोन प्रकार आहेत.        आघाड्यापासून क्षार तयार करतात. त्याला 'अपामार्ग क्षार' असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षारापासून तेल तयार करतात.  त्याचा उपयोग बहिरेपणा,  ऐकू न येणे,  कानात  विविध आवाज येणे यावर होतो. अपामार्ग क्षार हा वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. कारण तो तीक्ष्ण आहे.        पूर्वी दात घासण्यासाठी आघाड्याच्या काडीचाही उपयोग करीत. त्वचारोगावर आघाड्याच्या काढ्याचा उपयोग करतात. खोकल्यावर याचे चूर्ण मधातून चाटवावे. आघाडा हा वामक आहे. याच्या सेवनाने उलट्या होऊ शकतात. म्हणून वैद्याच्या सल्ल्याने याचा वापर करावा.       पायात काटा विशेषत: बाभळीचा काटा मोडल्यास आघाड्याचा रस चोळून लावावा, काटा वर येतो.       असा हा आघाडा आपणास उपयोगी आहे.

आभार

१०००० चा टप्पा ओलांडायला आपल्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार. असाच लोभ ठेवावा ही विनंती.

उपयुक्त वड

       भारतीय संस्कृतीने वर्षातील एका दिवसालाच याचे नाव दिले आहे, ’वटपौर्णिमा’. वडाचा फार मोठा वृक्ष असतो आणि खूप वर्षे टिकतो.  दीर्घायुष्याचे प्रतिक म्हणून वडाचे झाड मानले जाते. झाडाचा बुंधा मोठा डेरेदार असल्याने झाडाला पार बांधतात. वडाला नित्य नव्या पारंब्या फुटत असतात. वड, पिंपळ, औदुंबर हे वृक्ष हिंदूंनी फार पूजनीय मानले आहेत. या झाडांभोवती प्रदक्षिणा घालण्याचा स्त्री, पुरुषांचा प्रघात असे. विशेषत: स्त्रिया तर वडाला नित्य प्रदक्षिणा घालत असत. स्वयंपाक घरातील स्त्रिया घराबाहेर पडून त्यांनी प्रदक्षिणा मारल्यामुळे शरीराला व्यायाम होऊन बाहेरील मोकळी, ताजी हवा मिळण्याची ती सोय असावी. विशेषत: आजच्या प्रदुषणयुक्त आणि टी.व्ही.मय युगात तर याची जास्तच गरज आहे.          ईच्छित संततीप्राप्तीसाठी ’पुसंवन’ नावाचा विधी आयुर्वेदात वर्णन केला आहे. त्यामध्ये वडाच्या कोवळ्या कोंबांचा वापर करतात. मुलगा असो की मुलगी, जन्मणारे बालक सुदृढ, निरोगी जन्माला यावे यासाठी आयुर्वेदात खूप मार्गदर्शन आहे, त्याविषयी नंतर पाहू.        सारखी लघवी होणे, प्रमेह (फक्त मधुमेह नव्हे) यावर वडाच्या पारंब्यांचा उपयोग होतो

नैसर्गिक शीतपेयांचा आस्वाद घ्या !

    उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जशजशी वाढू लागते, तसतसे थंडपेयांच्या दुकानाकडे आपले पाय वळू लागतात. दूरदर्शनवरून होणारा जाहिरातींचा मारा आणि त्यांची चटकदार चव यामुळे कृत्रिम शीतपेयांची आर्डर आपोआप दिली जाते. पण प्रमाणाबाहेर स्ट्राँग पेय आणि साखर यामुळे कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने आरोग्य बिघडते. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपाची शीतपेये घेतल्यास ती पोषण करणारी, थंड, शरीराची ऊष्णता कमी करणारी असतात.     पाणी-   पाणी ही सर्वोत्कृष्ट नैसर्गिक शीतपेय आहे. ते खरे जीवन आहे. आयुर्वेदात पाण्याचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत. त्याविषयी नंतर कधी तरी. पाणी हे थंड आहे. फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातले गार केलेले पाणी चांगले. उन्हाळ्यात पाणी उकळून गार करून प्यावे. फील्टरचे पाणी जरी शुद्ध असले तरी पाणी उकळल्याने ते गुणांनी हलके होते. फ्रीजमधील थंड पाण्यामुळे भूक कमी होऊन पोटात जडपणा वाढतो, उलट माठाचे पाणी तुलनेने हलके असते. वाळा, चन्दन, मोगरा, गुलाब यासारख्या सुगंधीत द्रव्यांनी सुगंधीत करून प्यावे.     शहाळ्याचे, नारळाचे पाणीही तहान भागविणारे, थंड, उत्साहवर्धक, मूत्रल आहे. ते मात्र आह

केळी

       जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीची झाडे बहुतकरून सगळीकडे होतात. काहींच्या मामांच्या मालकीच्या केळीच्या बागाही असतील. असो. केळ्यांचे वेफर्स हा लोकप्रिय पदार्थ आहे. कच्च्या केळ्यांची, केळफुलांची भाजी करतात. केळ्यांची कोशिम्बिरही करतात. काही केळीच्या प्रकारांमध्ये केळाच्या गाभ्यात बिया असतात. रानकेळीमधल्या बिया 'देवी' या विकारावर अतिशय उपयुक्त आहेत. केळापासून 'कदलीक्षार' तयार करतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळे हा गोड, थंड, कफवर्धक, बलवर्धक पदार्थ आहे. केळे पचायला जड आहे. खूप भूक लागली असताना नुसती केळी खाल्ली असता उत्साही, तरतरीत वाटते. रानकेळी चे बी पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषावर उपयुक्त आहे, अशी वृद्ध वैद्य परंपरेत दिलेले आहे. खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, यावर केळीचे सेवन करावे. मात्र दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये, ते विरुद्धान्न आहे. विरुद्धान्न सेवन केल्यामुळे अनेक विकार होतात. केळी किंवा कोणतेही फळ आणि दूध यांचे शिकरण करून खाऊ नये. केळीच्या पानावर भोजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्याने अन्नात केळीचे

आंबा

    आंबा हे अमृतफळ आहे. कोंकण प्रदेशाला आंबा, फणस यांनी समृद्ध केले आहे. ग्रीष्म ऋतू सुरु झाला की घरोघर आमरसाच्या मेजवान्या होतात. आंब्याबरोबर आतली कोयसुद्धा औषधी आहे. मूळव्याध झाल्यावर रक्त पडणे, रक्तप्रदर, अतिसार, जुलाब यावर आंब्याच्या कोयीतील बियांचे चूर्ण मधातून द्यावे. पिकलेला आंबा थंड, बल वाढविणारा आहे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कैरीचे पन्हे करून पितात. कैरीचा गर, गूळ यापासून कैरीचे पन्हे करतात. हे पन्हे तहान भागविणारे, दाहशामक, उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यात नुसत्या पाण्याने समाधान न झाल्यास कैरीचे पन्हे घ्यावे. कैरीचे लोणचे मात्र उन्हाळ्यात खाऊ नये, ते पावसाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी थोडे खाण्यास हरकत नाही.      आंबा हे एक फळ असे आहे की त्याचा रस दुध मिसळून खाण्यास हरकत नाही. असा रुचकर, शक्तीवर्धक आंबा आहे.    

कुमारी / कोरफड

   कोरफड ही नित्य वापरातील वनस्पती आहे. ती सदैव, ताजी, टवटवीत दिसते म्हणून तिला 'कुमारी' असेही म्हणतात. यकृत, प्लीहेच्या सर्व रोगांवर कोरफड अतिशय उत्तम आहे. यकृताला सूज येणे, कावीळ, बिलीरूबिनचे प्रमाण वाढणे यावर कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफड यकृताचे टोनिक आहे. तसेच प्लीहावृद्धी, रक्त कमी होणे यावरही कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. काविळीवर कोरफडीचा रस, कोरफडीपासून तयार केलेल्या कुमारी आसवाचा वापर करतात.     डोळे येणे, डोळ्यांची आग होणे यावर कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. कफ होणे, खोकला यावर कोरफडीचा गर मधातून द्यावा. केसांच्या वाढीसाठी, केस मुलायम आणि तजेलदार व्हावेत म्हणून कोरफडीचा गर केसांना लावतात.      सौन्दर्यासाठी, त्वचा ताजीतवानी दिसावी, चेहर्यावरचे डाग, पुळ्या कमी व्हाव्यात  म्हणून कोरफडीचा गर लावावा. कोरफड रक्तशुद्धीकर असून ताप कमी करणारी, पित्तनाशक, भूक वाढवणारी आहे.

वाळा

   उन्हाळ्यात माठाच्या पाण्यात वाळा घातला असता ते पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे खिडक्या, दारे, गाड्या यांना लावतात. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत.        वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे  यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो.     मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले 'उशीरासव' इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयो

कडुनिंब

     भारतीय संस्कृतीच्या नवीन वर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने होते. नवीन वर्षाचे स्वागत तोंड गोड करून न करता कडु तोंड करण्याची प्रथा का आहे ? शरीरात संचित झालेल्या कफाचे शमन व्हावे हा त्यामागील उद्देश आहे.  गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबा ची कोवळी पाने, फुले, गूळ, आमसोल, जिरे, ओवा, सैंधव   यांची चटणी करून सकाळी अनशेपोटी खाण्याची प्रथा आहे. वर्षातून एकदा तरी ही वनस्पती खाल्ली जावी हा त्यामागील उद्देश आहे.  केवळ गुढी पाडव्याच्या दिवशी  कडुनिंबाचे सेवन न करता वसंत ऋतूत नियमित सेवन करावे.         गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी सजविण्यासाठी निंबाच्या डहाळ्या बांधतात. कडुनिंबाच्या झाडामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. निंबाची वाळलेली पाने जाळली असता डासांचे प्रमाण कमी होते. निंबाचे झाड खूप वर्षे टिकते. त्यामुळे वातावरण निरोगी राहून सावलीही दाट मिळते.  हे झाड विशेष करून भारतीय उपखंडातच आढळते. झाड  जुने झाल्यावर त्याच्या खोडाला सुगंधी वास येतो.      त्वचारोगांवर कडुनिम्बाचा उपयोग सर्वांना माहिती आहेच. आंघोळीच्या पाण्यात याची पाने घातली असता त्वचा मऊ, मुलायम, कांतिमान होते. अंगावर पित्त, गांध्

ऊस

    ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, अशी म्हण प्रचारात असली तरी आयुर्वेदानुसार तो मुळापासून औषधी आहे.  औषधी गवतांची जी पाच तृणमुळे सांगितलेली आहेत त्यामध्ये ईक्षु म्हणजे ऊसाच्या मुळांचा समावेश केला आहे.  ही तृणपंचमुळे थंड, लघवीच्या, किडनीच्या विकारांवर उपयुक्त आहेत. तृणपंचमुळांवर स्वतंत्रपणे नंतर लिहीन.     ऊस हा गवताचाच आधुनिक प्रकार (Modified) आहे. ऊसाने महाराष्ट्राचे अर्थकारण आणि राजकारण समृद्ध केले आहे.  ऊस हा बुडख्याजवळ जास्त गोड असतो. शेन्ड्याकडे खारट होत जातो. ऊसाच्या मुळांप्रमाणेच ऊसाचा रस अतिशय औषधी आहे. ऊसाचे करवे चावून चोखलेला ऊसाचा रस हा यंत्राने काढलेल्या रसापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. यंत्राने रस काढताना तो स्वच्छ करून, कीड, माती इ. काढून रस काढला जाईल याची खात्री नसते. तसेच ऊसाचा ताजा रस जास्त श्रेष्ठ आहे. ऊसाचा रस बराच वेळ तसाच ठेवला असता हवा, माशा इ. च्या संपर्कामुळे त्यात विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.     गोड असूनही सर्वात कमी कॅलरी असणारे हे नैसर्गिक शीतपेय आहे. (आयुर्वेदात स्पर्शाला थंड या अर्थाने शीत हा शब्द वापरला नाही, तर पचनानंतर शरीरात दिसणारा गुणध

द्राक्षे

        आमच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे अतिशय प्रसिद्ध. महाशिवरात्रीनंतर थोडे ऊन वाढायला लागले की द्राक्षात गोडी उतरते. द्राक्षात पाण्याचे प्रमाण जास्त असते. आयुर्वेदानुसार द्राक्षे ही रस धातूचे पोषण करणारी आहेत. त्वचा मुलायम, कांतीमान (त्वचेला 'ग्लो' येणे) होण्यासाठी द्राक्षांचे नियमित सेवन करावे. विशेषत: उन्हाळ्यात उन्हाने त्वचा कोरडी, सुरकुतलेली होते त्यावर द्राक्षासारख्या रसदार फळांचा उपयोग होतो.     खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी तहान न भागणे यावर द्राक्षे खावीत. अम्लपित्तावर गोड द्राक्षांचा चांगला उपयोग होतो. द्राक्षे खाण्याआधी ती स्वच्छ धुवून घ्यावीत. कारण त्यावर किटकनाशकांची भरपूर फवारणी झालेली असते. कच्ची, आंबट द्राक्षे खाऊ नयेत.     द्राक्षे वेगवेगळ्या प्रकारे सुकविल्यानंतर त्यापासून किसमिस, बेदाणे, मनुका तयार करतात. काळ्या मनुका आयुर्वेदाने श्रेष्ठ मानल्या आहेत. त्या पित्तशामक, अनुलोमक, थंड असतात. शरीरातील रक्तधातूच्या वाढीसाठी त्यांचे सेवन करावे. रक्तपित्त, त्वचेखालील रक्तस्रावाचा एक आजार यावरही मनुकांचा उपयोग होतो.  शौचास साफ होत नसल्यास मृदु विरेचनास

हसा, पण लठ्ठ होऊ नका !

      'हसा, आणि लठ्ठ व्हा' अशा स्वरूपाची म्हण प्रचारात आहे. हसण्याचा आणि लठ्ठपणाचा कितपत जवळचा संबंध आहे हे माहिती नाही. कारण प्रख्यात विनोदवीर चार्ली चापलीन आणि आचार्य अत्रे यांची व्यक्तिमत्त्वे भिन्न होती. पण लठ्ठपणा हा अनेक रोगांचे मूळ असल्यामुळे तुम्ही भले मनसोक्त हसा, पण लठ्ठ मात्र होऊ नका.      आयुर्वेदात आठ प्रकारची निंदनीय शरीरे सांगितलेली आहेत. त्यामध्ये अतिस्थूल शरीर हे निंद्य मानले आहे. आजच्या २१ व्या शतकात तर बैठ्या जीवनशैलीमुळे (आहाराच्या मानाने व्यायाम अल्प प्रमाणात) स्थूलतेचा शाप अनेकांना मिळालेला आहे. गरीब, कष्टकरी वर्ग वगळता अगदी कनिष्ठ मध्यमवर्गापासून ते उच्च वर्गीयांपर्यंत, नवश्रीमन्तांपर्यंत बहुतेकांना अति सकस आणि अति पौष्टिक आहारामुळे स्थूलतेचा विकार जडलेला आढळतो. गोड, थंड, तेलकट, तुपकट पदार्थांचे भरपूर सेवन, वेळी-अवेळी जेवण घेणे, अति प्रमाणात आहार घेणे, रात्री उशिरापर्यंत जड जेवण, पार्ट्या, सतत दुचाकी, चारचाकी वाहनातून प्रवास त्यामुळे व्यायाम तर सोडाच साधे पायी फिरणेही नाही, सकाळी लवकरपासून ते रात्री उशिरापर्यंत कामाच्या वेळा त्यामुळे वाढलेला मानसिक तणाव अ

कवठ (कपित्थ)

    कवठ हे वसंत ऋतूत येणारे फळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाची गूळ घालून चटणी करतात. भगवान शंकराचा प्रसाद म्हणून कवठाचे सेवन करतात. महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी श्रद्धा आहे.      दक्षिण महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाच्या वाडीला कवठाची बर्फी मिळते. अतिशय रुचकर असा हा खाद्य पदार्थ आहे. कवठाची बर्फी, चटणी अतिशय रुचकर, पित्तशामक, जिभेची चव वाढवणारी आहे. कवठ हे अम्लपित्तावर खावे. काविळीवर कवठाच्या पाल्याचा रस घ्यावा.      कवठाने आवाज चांगला होतो. कवठ खोकल्यावर गुणकारी आहे.      मात्र कच्चे कवठ खाऊ नये. चांगले पिकलेले कवठ खावे. असे हे बहुगुणी कवठ आहे.

संपर्कासाठी

मंडळी, २००० च्या वर पेज views आणि ब्लॉगला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामुळे आयुर्वेदाला मिळणारा प्रतिसाद पाहून मला अतिशय आनंद झाला. अनेकांना माझ्याशी संपर्क कसा करावा हे माहीत नव्हते. त्यासाठी मी माझा इ मेल ब्लॉगवर देत आहे.  

मेथी

      मेथीची पालेभाजी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे उत्पादन खूप होते. तसेच मेथीचे बी बाजारात मिळते. या मेथीच्या बीपासून मेथीचे लाडू तयार करतात. हे लाडू हिवाळ्यात, हेमंत, शिशिर ऋतूत खातात. मेथीचे लाडू अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक असतात. मेथीची भाजीसुद्धा अतिशय  पौष्टिक असते. तुरीच्या डाळीबरोबर मेथीचे दाणे एकत्र करून त्याचे कालवण करतात. त्याला 'पेंडपालं' असे म्हणतात.       बाळन्तिणीला डिंकाचे, मेथीचे लाडू खायला देतात. प्रसूतीकाळात झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी हा आहार देतात. मेथीमुळे बाळन्तिणीच्या अंगावरचे दूधसुद्धा वाढते. तसेच गर्भाशय शोधन होते. प्रसूतीकाळात गर्भाशयात साचलेल्या, साठलेल्या दोषांचा निचरा करण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.       मेथीच्या बिया शरीरातील अतिरिक्त मेद कमी करतात. बियांचे चूर्ण नियमित घेतल्यास मेद कमी होतो. प्रमेहावर मेथीच्या बियांचा चांगला उपयोग होतो. रक्तातील साखर वाढणे, वारंवार लघवीला जावे लागणे, बैठ्या जीवनशैलीमुळे होणारा मधुमेह (टाईप २) यावर दाणामेथीचा चांगला उपयोग होतो.      विविध वाताचे विकार, कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखी यावर म

कुळीथ / कुलित्थ (हुलगे)

      हिवाळा आला की शेंगोळे किंवा कुळीथाच्या जिलब्या घरोघर केल्या जातात. कुळीथाचे पिठलेही फार प्रसिध्द आहे. नाशिक, धुळे जिल्ह्यात वरील पदार्थ फार फार प्रसिध्द आहेत. ताकाबरोबर केलेले  कुळीथाचे कालवण खूपच चविष्ट लागते. कुळीथा लाच हुलगे तर संस्कृतमध्ये कुलित्थ असे म्हणतात.       कुळीथ हे अतिशय उष्ण आहेत. म्हणून कुळीथ फक्त हिवाळ्यात खातात. इतर ऋतूत त्याचा वापर करू नये. तसेच पित्तप्रकृतीच्या माणसांनी याचे जपून सेवन करावे. कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते. अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.      मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथा चा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.        पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथा चा चांगला उपयोग होतो. पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो.

तिळाचे महत्त्व

         साधारणपणे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यामध्ये शिशिर ऋतु येतो. या ऋतूत सृष्टीत सर्वत्र रूक्षता असते. झाडांची पाने गळतात, त्याला पानगळ म्हणतात. वातावरणात बोचरी थंडी, गारठा असतो. अशा काळात मकरसंक्रांत येते. भारतीय संस्कृतीत असलेल्या सर्व रुढी, परंपरा ह्या भारतीय हवामानाचा विचार करूनच तयार केलेल्या आहेत. म्हणूनच मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळगू ळ   वाटण्याची प्रथा आहे. तीळगूळामध्ये तीळ आणि गूळ हे दोन प्रमुख घटक असतात.        तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तैलम ।  तिळापासून निघते ते तेल होय. म्हणूनच तेलाला ’तेल’ हे नाव प्राप्त झाले. तेलात तीळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर ऋतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे. तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टीक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत.       सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. हिवाळ्यात तिळतेलाने अंगाला अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मऊ, कांतिमान होते. सांधेदुखी, अंगदुखी, स्नायुदुखी यावर तिळतेलाची मालिश करतात. हे तेल व्रणरोपक आहे. अस्

धनुर्मास

      धनुर्मासालाच धुंधुरमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हिवाळ्यामध्ये वातावरणातील शीतलतेमुळे देहोष्मा  शरीरांतर्गत जातो आणि त्यामुळे जाठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागते. अशा वेळी त्या जाठराग्नीला अनुरूप असा आहार घेतला नाही तर तो शरीरातील धातूंचे पचन करून दुर्बलता आणतो. त्यामुळे बल, पुष्टीदायक असा आहार घेणे आवश्यक आहे.          यासाठीच या काळात धनुर्मास पाळायची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची प्रथा आहे. त्यावेळी उठल्यानंतर आन्हिके उरकल्यावर नैविद्य दाखवून भरपेट भोजनच करावे अशी धनुर्मासाची प्रथा आहे. आहे की नाही खवैय्यान्साठी पर्वणी !        भोजनासाठी पदार्थ तरी कोणते ? गरम  गरम  खिचडी, त्यावर तूप,  तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, त्यावर लोणी, भरीत, वांग्याची भाजी, कढी, चटणी.         काय मंडळी सुटले की नाही तोंडाला पाणी ?          अशा रीतीने जाठराग्नीचे शमन झाल्यावर मग पुढील दैनंदिन व्यवहाराला लागायचे, अशी प्रथा होती.        अर्थात हा धनुर्मास फक्त हिवाळ्यात पाळायचा असतो. पंचांगातसुद्धा धनुर्मास सुरु कधी होतो आणि संपतो कधी हे दिलेले असते. सू