Posts

Showing posts from May, 2011

नैसर्गिक शीतपेयांचा आस्वाद घ्या !

    उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जशजशी वाढू लागते, तसतसे थंडपेयांच्या दुकानाकडे आपले पाय वळू लागतात. दूरदर्शनवरून होणारा जाहिरातींचा मारा आणि त्यांची चटकदार चव यामुळे कृत्रिम शीतपेयांची आर्डर आपोआप दिली जाते. पण प्रमाणाबाहेर स्ट्राँग पेय आणि साखर यामुळे कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने आरोग्य बिघडते. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपाची शीतपेये घेतल्यास ती पोषण करणारी, थंड, शरीराची ऊष्णता कमी करणारी असतात.     पाणी-   पाणी ही सर्वोत्कृष्ट नैसर्गिक शीतपेय आहे. ते खरे जीवन आहे. आयुर्वेदात पाण्याचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत. त्याविषयी नंतर कधी तरी. पाणी हे थंड आहे. फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातले गार केलेले पाणी चांगले. उन्हाळ्यात पाणी उकळून गार करून प्यावे. फील्टरचे पाणी जरी शुद्ध असले तरी पाणी उकळल्याने ते गुणांनी हलके होते. फ्रीजमधील थंड पाण्यामुळे भूक कमी होऊन पोटात जडपणा वाढतो, उलट माठाचे पाणी तुलनेने हलके असते. वाळा, चन्दन, मोगरा, गुलाब यासारख्या सुगंधीत द्रव्यांनी सुगंधीत करून प्यावे.     शहाळ्याचे, नारळाचे पाणीही तहान भागविणारे, थंड, उत्साहवर्धक, मूत्रल आहे. ते मात्र आह

केळी

       जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीची झाडे बहुतकरून सगळीकडे होतात. काहींच्या मामांच्या मालकीच्या केळीच्या बागाही असतील. असो. केळ्यांचे वेफर्स हा लोकप्रिय पदार्थ आहे. कच्च्या केळ्यांची, केळफुलांची भाजी करतात. केळ्यांची कोशिम्बिरही करतात. काही केळीच्या प्रकारांमध्ये केळाच्या गाभ्यात बिया असतात. रानकेळीमधल्या बिया 'देवी' या विकारावर अतिशय उपयुक्त आहेत. केळापासून 'कदलीक्षार' तयार करतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळे हा गोड, थंड, कफवर्धक, बलवर्धक पदार्थ आहे. केळे पचायला जड आहे. खूप भूक लागली असताना नुसती केळी खाल्ली असता उत्साही, तरतरीत वाटते. रानकेळी चे बी पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषावर उपयुक्त आहे, अशी वृद्ध वैद्य परंपरेत दिलेले आहे. खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, यावर केळीचे सेवन करावे. मात्र दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये, ते विरुद्धान्न आहे. विरुद्धान्न सेवन केल्यामुळे अनेक विकार होतात. केळी किंवा कोणतेही फळ आणि दूध यांचे शिकरण करून खाऊ नये. केळीच्या पानावर भोजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्याने अन्नात केळीचे

आंबा

    आंबा हे अमृतफळ आहे. कोंकण प्रदेशाला आंबा, फणस यांनी समृद्ध केले आहे. ग्रीष्म ऋतू सुरु झाला की घरोघर आमरसाच्या मेजवान्या होतात. आंब्याबरोबर आतली कोयसुद्धा औषधी आहे. मूळव्याध झाल्यावर रक्त पडणे, रक्तप्रदर, अतिसार, जुलाब यावर आंब्याच्या कोयीतील बियांचे चूर्ण मधातून द्यावे. पिकलेला आंबा थंड, बल वाढविणारा आहे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कैरीचे पन्हे करून पितात. कैरीचा गर, गूळ यापासून कैरीचे पन्हे करतात. हे पन्हे तहान भागविणारे, दाहशामक, उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यात नुसत्या पाण्याने समाधान न झाल्यास कैरीचे पन्हे घ्यावे. कैरीचे लोणचे मात्र उन्हाळ्यात खाऊ नये, ते पावसाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी थोडे खाण्यास हरकत नाही.      आंबा हे एक फळ असे आहे की त्याचा रस दुध मिसळून खाण्यास हरकत नाही. असा रुचकर, शक्तीवर्धक आंबा आहे.    

कुमारी / कोरफड

   कोरफड ही नित्य वापरातील वनस्पती आहे. ती सदैव, ताजी, टवटवीत दिसते म्हणून तिला 'कुमारी' असेही म्हणतात. यकृत, प्लीहेच्या सर्व रोगांवर कोरफड अतिशय उत्तम आहे. यकृताला सूज येणे, कावीळ, बिलीरूबिनचे प्रमाण वाढणे यावर कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफड यकृताचे टोनिक आहे. तसेच प्लीहावृद्धी, रक्त कमी होणे यावरही कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. काविळीवर कोरफडीचा रस, कोरफडीपासून तयार केलेल्या कुमारी आसवाचा वापर करतात.     डोळे येणे, डोळ्यांची आग होणे यावर कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. कफ होणे, खोकला यावर कोरफडीचा गर मधातून द्यावा. केसांच्या वाढीसाठी, केस मुलायम आणि तजेलदार व्हावेत म्हणून कोरफडीचा गर केसांना लावतात.      सौन्दर्यासाठी, त्वचा ताजीतवानी दिसावी, चेहर्यावरचे डाग, पुळ्या कमी व्हाव्यात  म्हणून कोरफडीचा गर लावावा. कोरफड रक्तशुद्धीकर असून ताप कमी करणारी, पित्तनाशक, भूक वाढवणारी आहे.