Posts

सीताफळ

                 सीताफळ हे अतिशय थंड आहे. म्हणूनच शीतफळ-शीताफळ-सीताफळ असे याला म्हणतात. सीताफळे साधारणपणे शरद ऋतूच्या शेवटी येतात. मात्र हे फळ थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा. ही फळे गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.                    सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुलाम्नां लावाव्या. नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.                     लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.   
ब्लॉगवरील सर्व अनुयायी, वाचक, चाहते यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! ही दिपावली आपणा सर्वांना सुख, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना !

शरदाचे चांदणे २

मंडळी,            शरद ऋतूत विरेचन व रक्तमोक्षण या कर्मांबरोबरच आहारविहाराची पथ्येही पाळावी लागतात. रात्री विशेषतः जडान्न खाऊ नये. दही, क्षारयुक्त पदार्थ, बर्फ, थंड पदार्थ, जास्त खारट, आंबट, तिखट, मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत. भेळ, मिसळ, शेव, चिवडा, वडे, भजे, इडली, डोसा, पाणीपुरी आदि पित्तकारक पदार्थ खाऊ नयेत. जास्त चहा पिऊ नये. भात, ज्वारी, गहू, डाळी, द्विदल धान्ये वापरावीत.           पुरणपोळी गायीचे तूप टाकून खावी. लसूण, लोणचे पूर्णपणे बंद करावे. विविध फळे, मोरावळा, चांगले तूप खाण्यात असावे. आहार मोजकाच घ्यावा. पोटाला तडस लागेल इतके जेऊ नये.           शरद ऋतूत 'अगस्ती' ता-याचा उदय दक्षिणेला होतो. याचे माहिती आपण घेतली आहेच. अगस्ती ता-यामुळे शुद्ध झालेले पाणी या ऋतूत प्यावे. दिवसा ऊन जास्त असल्याने उन्हापासून बचाव करावा. टोपी, छत्री, गॉगल यांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण आहार विहार ठेवल्यास हे शरदाचे चांदणे आपणाला निश्चितच सुखकर व आल्हाददायक वाटेल.