Posts

Showing posts from November, 2011

शबरीची बोरे

शबरीने आपली उष्टी बोरे पावन करून ठेवलेली आहेतच. प्रभु श्रीरामांना मोठ्या भक्तीने उष्टी बोरे खाऊ घालणारया शबरीने बोरं मात्र अजरामर करून ठेवली आहेत. तसेच परीक्षित राजाला सर्पदंश हा बोरातील अळीच्या रूपाने आलेल्या तक्षक सर्पामुळे झाला, अशी कथा आहे.                  चिंचा, बोरे हा तर लहान मुलांचा आवडता मेवाच. तुळशीच्या लग्नापासून बाजारात बोरं यायला सुरुवात होते. आकाराने मोठी, मधुर अशी मेहरूणची बोरं प्रसिद्धच आहेत.  सारखी खा-खा होणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे अशा भस्मक रोगावर बोराच्या बियांचे चूर्ण घ्यावे. अतिसार, संडासवाटे खूप पातळ जुलाब होणे, आव यावर बोराच्या मुळ्या आणि तीळ यांचे वेगवेगळे कल्क करून नंतर ते एकत्र करून गायीच्या दुधातून घ्यावे. संडासवाटे रक्त पडत असल्यास बोराच्या मुळ्यांचा चांगला उपयोग होतो. केसतोडा झाला असल्यास तेथे बोराचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लावावा. उलट्या होत असल्यास बोराच्या बियांचे चूर्ण मधातून चाटवावे. शरीराच्या कोणत्याही भागाची आग होत असल्यास बोरीचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लावावा. बोर हे तहान भागविणारे, पित्तशामक, बल्य आहे.

तुळस

Image
मंडळी, भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदुच्या दारापुढे तुळशीवृंदावन असतेच. भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीला पूजनीय वनस्पतींमध्ये अग्रस्थान आहे. ही वनस्पती फक्त भारतीय उपखंडातच आढळते. सध्या मनपा निवडणुका जवळ आल्यामुळे गल्लोगल्लीच्या नेत्यांच्या पुढाकारामुळे तुळशीची लग्ने धूमधडाक्यात पार पडत आहेत. असो.  साध्या सर्दी खोकल्यापासून तर अनेक आजारांवर तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या एका एका गुणावर Ph.D. च्या डिग्र्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या आहेत.  तुळशीच्या प्रकारांपैकी पांढरी (राम) व काळी (कृष्ण) तुळस हे दोन मुख्य प्रकार. कृष्ण तुळस ही गुणांनी सर्वात श्रेष्ठ आहे.  तुळशीचा चहा दूध व चहा न टाकता घेतल्यास सर्दी, खोकला, ताप यावर उपयुक्त आहे. तुळशीचा काढा करून घेतल्यास तो वरील विकारांबरोबरच घसा दुखणे, अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे यावर उपयुक्त आहे. एक भाग तुळस म्हणजे पाने, सोळा भाग पाणी एकत्र करून एक अष्टमांश राहीपर्यंत आटवावे. नंतर गाळून तो काढा प्यावा. ही काढा करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.  दम्यावर तुळशीचा खूप उपयोग आहे.  तुळशीचा रस काढून तो मधातून चाटव

हिवाळ्यातील आरोग्य

                हेमंत आणि शिशिर ऋतु मिळून हिवाळा हा ऋतु तयार होतो. या ऋतूत सूर्य दक्षिण ध्रुवाकडे सरकतो. म्हणजेच दक्षिणायन होते. दिवस लहान तर रात्र मोठी असते. आयुर्वेदानुसार हा काळ ’विसर्गकाळ’ असतो. म्हणजे या काळात निसर्गाकडून प्राणिमात्राला बल प्राप्त होत असते. दिवसभर सूर्यप्रकाश असला तरी वातावरणात गारवा असल्याने प्रफुल्लित आणि उत्साही वाटते. सर्व प्रकारची कामे करण्यास उत्साह वाटतो. रात्री मात्र गारठा असल्याने ऊबदार पांघरूणात पडून रहावेसे वाटते. आयुर्वेदानुसार हिवाळा हा बलदायक, आरोग्यकारक काळ सांगितलेला आहे. शिशिर ऋतूत वातावरणात रुक्षता जास्त वाढते. झाडांची पाने गळतात. शिशिर ऋतूत ’पानगळ’ सुरु होते. त्यामुळे सर्व वृक्ष, लता, वेली, झुडुपे, एकूणच सर्व सृष्टी ओकीबोकी आणि निस्तेज दिसू लागते.  हिवाळ्यात शरीराची बाहेरची ऊष्णता कमी होते. त्यामुळे जाठराग्नी चांगलाच प्रदीप्त होतो. म्हणून हिवाळ्यात भरपूर भूक लागते. म्हणून या ऋतूत दोन्ही वेळा भरपूर प्रमाणात आहार घ्यावा. गोड, आंबट पदार्थांचे आहारात जास्त प्रमाण ठेवावे. अर्थात स्वत:ची प्रकृतीचा आणि आजारांचा विचार करावा. तसेच विशिष्ट रोगांमध्ये