द्राक्षे


        आमच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे अतिशय प्रसिद्ध. महाशिवरात्रीनंतर थोडे ऊन वाढायला लागले की द्राक्षात गोडी उतरते. द्राक्षात पाण्याचे प्रमाण जास्त असते. आयुर्वेदानुसार द्राक्षे ही रस धातूचे पोषण करणारी आहेत. त्वचा मुलायम, कांतीमान (त्वचेला 'ग्लो' येणे) होण्यासाठी द्राक्षांचे नियमित सेवन करावे. विशेषत: उन्हाळ्यात उन्हाने त्वचा कोरडी, सुरकुतलेली होते त्यावर द्राक्षासारख्या रसदार फळांचा उपयोग होतो.
    खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी तहान न भागणे यावर द्राक्षे खावीत. अम्लपित्तावर गोड द्राक्षांचा चांगला उपयोग होतो. द्राक्षे खाण्याआधी ती स्वच्छ धुवून घ्यावीत. कारण त्यावर किटकनाशकांची भरपूर फवारणी झालेली असते. कच्ची, आंबट द्राक्षे खाऊ नयेत.
    द्राक्षे वेगवेगळ्या प्रकारे सुकविल्यानंतर त्यापासून किसमिस, बेदाणे, मनुका तयार करतात. काळ्या मनुका आयुर्वेदाने श्रेष्ठ मानल्या आहेत. त्या पित्तशामक, अनुलोमक, थंड असतात. शरीरातील रक्तधातूच्या वाढीसाठी त्यांचे सेवन करावे. रक्तपित्त, त्वचेखालील रक्तस्रावाचा एक आजार यावरही मनुकांचा उपयोग होतो.  शौचास साफ होत नसल्यास मृदु विरेचनासाठी मनुका रोज रात्री चावून खाव्यात.
    खोकला, कफ, दमा यावर मनुकांचा, मधुर द्राक्षांचा चांगला उपयोग होतो. आजारपणानंतरच्या अशक्तपणावर मनुका खाव्यात. घसा बसणे, घसा खवखवणे यावर काळ्या मनुका खाव्यात. आवाज चांगला, मधुर होण्यासाठी मनुकांचाही उपयोग होतो.
    कष्टाने थोडी लघवी होणे, लघवीला आग होणे, जळजळणे यावर द्राक्षे किंवा मनुका पाण्यात भिजवून घ्याव्यात.
    'खर्जूरादि मंथ' ह्या औषधात काळ्या मनुका वापरतात. मदात्यय (दारूच्या व्यसनाच्या अवस्था), भूक न लागणे, जिभेला चव नसणे यावर याचा उपयोग होतो.
    द्राक्षांपासून सुप्रसिद्ध आणि सर्वांचे आवडते 'द्राक्षासव' करतात. याची चव जवळजवळ प्रत्येकाने घेतली असेल. कित्येक तर द्राक्षासव (?) नियमित सेवन करणारे असतील. दमा, खोकला, अग्निमांद्य यावर द्राक्षासवाचा उत्तम उपयोग होतो.  

Comments

Unknown said…
आपली द्रक्षासावाबद्दल माहिती आवडली

द्राक्षांपासून जगप्रसिद्ध (सुप्रसिद्ध) आणि सर्वांचे आवडते 'द्राक्षासव' करणारा नाशिक जिल्हा जगाच्या नकाश्यवर झळकला आहे . प्रतेकाने इल चमचा जरी घेतला (घेतली) तरी आजून १० पट वायनरी चालतील. आणि आपल्याला नवनवीन चावी चाखायला मिळतील. !!!!!
Unknown said…
द्राक्षासव अप्रतिम चविष्ट प्रकार आसतो.. आहे . खाण्याचे नखरे सुद्धा करता येतात (घेता घेता). ह्या संदर्भाने खूप काही सांगता येयील. नाशिक जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाश्यवर वेगळ्या धुंदीत (नशेत) द्रक्षसावाने लिहिले गेले आहे.

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड